गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

विश्वकर्मीयांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वैचारिक क्रांतीची ठिणगी :अ.भा. विश्वकर्मा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध परिवर्तनवादी जेष्ठ साहित्यिक,महाराष्ट्राचे प्रबोधनकार प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर .यांचे संपूर्ण भाषण.



१३ जानेवारी २०१९ रोजी धुळे येथे पार पडलेल्या अ.भा. विश्वकर्मा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध परिवर्तनवादी जेष्ठ साहित्यिक , विचारवंत , प्रभावशाली वक्ते , महाराष्ट्राचे प्रबोधनकार प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर .यांचे संपूर्ण भाषण. विश्वकर्मीयांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वैचारिक क्रांतीची ठिणगीच. क्रांती पेटती ठेवण्यासाठी आपल्या संग्रही असावे म्हणुन ३ भागात उपलब्ध करुन देत आहोत. घणाघाती वक्तृत्वशैलीचा आस्वाद घेण्यासाठी ऑडियोही सोबत देत आहोत
               सन्माननीय व्यासपिठ आणि उपस्थित विश्वकर्मीय बंधुंनो, सुभाष आहिरे लिखित पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पहिल्या विश्वकर्मीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने आज मी उभा आहे .पण जे मी पाहतो आहे तो लांबलेला सत्काराचा कार्यक्रम,मी चुकीच्या ठिकाणी आलो की काय असं मला वाटायला लागलं. नेमका कार्यक्रम कसला आहे, हे मला अजुनही कळालेलं नाही.मध्येच जयघोष चालु आहे.विठ्ठलाचा चालू आहे,विश्वकर्माचा चालू आहे.काय काय बरंच चालू  आहे.संमेलन हे विचारांसाठी असतं. विचार द्यायचे असतात आणि घ्यायचे असतात. विचारमंथन जर झाले नाही तर संमेलनाला अर्थ उरत नाही.               परवा यवतमाळचं संमेलन विचारसंघर्षामुळे, संस्कृतीसंघर्षामुळं गाजलंआणि मी आता तुमच्यासमोर काय बोलणार हा माझ्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे.कारण बऱ्याच वेळच्या धार्मिक वातावरणामध्ये आपण सर्वच जण वावरतो आहोत.ज्यानं देशाचं आणि आपल्या सगळयांचं वाटोळं केलं त्याच वातावरणात पुन्हा आपण जातो आहोत.त्याच्या बाहेर येण्याची, आधुनिक होण्याची तुमची आमची तयारी आहे का? आणि ती तयारी तुम्हाला आम्हाला करावी लागेल. स्वामी दिव्यानंद बापु यांनी जो प्रश्न विचारला तो महत्वाचा प्रश्न आहे. तो खुप काही गोष्टी सांगुन गेला. ते असं म्हणाले की आपली किंमत काय? आणि ही किंमत आपणच घालवली हे माझे उत्तर आहे. ....आपणच आपली किंमत घालवली त्यामुळे आपल्याला कोणीच विचारत नाही. इथे रामदास वाघांचा सत्कार झाला.पांडुरंग सुतार आले होते की नाही माझं लक्षात नाही.येथे संजय बोरुडे आहेत, डोरले आहेत इथं. ते लेखक आहेत यांना कोणीही विचारत नाही बाहेर ,  मला माहीत आहे.तुम्ही आज सत्कार केला, ते आले धावपळ करत ते ठीक आहे. म्हणजे काय? विश्वकर्माची जी पाच शक्तिस्थाने मानली जातात त्यांची किंमत काय? असा तो प्रश्न आहे आणि तो मी उपस्थित केलेला नाही माझ्या पुस्तकांमध्ये अगोदरच उपस्थित केलेला आहे.
               पराग आहेरांनी  आपली किती लोकसंख्या आहे हे सुद्धा सांगीतलं.  जातीनिहाय लोकसंख्या किती आहे याचा आकडा पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार सांगत नाही. अनेक वेळा  खासदारांनी मागणी करुनही ते संसदेत त्याच्यावर बोलत नाहीत…… का बोलत नाहीत? किंमत नाही तुमच्या म्हणण्याला , त्यामुळं. काय किंमत आहे तुमच्या म्हणण्याला? समाजामध्ये आपल्या म्हणण्याला काही किंमत आहे का? त्याचं कारण आहे...आपलंच अस्तित्व आपण कधी दाखवत नाही, नंबर एक. आम्ही कोणी आहोत हे आपल्याला जाणवतच नाही. आपण दुसऱ्यांच्या पाठीमागे पळत राहतो. आता इथे उल्लेख केला संचालन करणाऱ्यांनी, की स्वामी दिव्यानंद बापूंनी पंतप्रधानांना विराट विश्वकर्मा समजावून सांगितला.मग त्यांनी काहीतरी केलं. त्यांना माहित नाही का ते? ते  ओबीसी म्हणून सांगतात स्वतःला. आणि त्यांना एवढं विश्व निर्माण करणाऱ्या विश्वकर्मा बद्दलच माहीत नाही. ही सगळी गंमत आहे. अख्खी  मुंबई जी आधुनिक दिसते,आणि चांगली मुंबई दिसते, ती निर्माण करणारा माणूस सोनार आहे, रेल्वे निर्माण करणारा, रेल्वेचा आग्रह धरणारा माणूस सोनार आहे.  आम्ही औरंगाबादहुन मागणी केली होती की त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे. ज्याने मुंबई आधुनिक बनवली तो माणूस किती मोठा असेल!  जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव द्यावे ही आमची अनेक दिवसाची  मागणी आहे. कोणीही दखल घेत नाही. आपली किंमत काय? तर ती अशी आहे.

सॅम पित्रोदा यांनी या देशाचं शैक्षणिक धोरण सांगितले. परंतु आम्हाला अलिकडं कुठंच दिसत नाही नाव त्यांचं. कारण ते शिक्षणच बंद करायचं आहे सद्याच्या सरकारला आणि आम्ही तर त्यांच्या मागे लागलोय की सध्याचं  सरकार फारच चांगलं आहे.जरा जागे व्हा! आपल्याला किंमत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याची दोन उदाहरणं आपल्याला सांगतो. नंबर एक. आता एक किर्तनकार आले होते. ते ज्या पद्धतीने धोतर नेसले आहेत. धोतर सांगतोय मी तुम्हाला. ते ब्राह्मणी पद्धतीचे धोतर नेसलेत. आता कोणता पेहराव कोणी घालावा याच्यावर कोणी बोलू नये.आपल्याकडे ते सगळे आलेत, भाजपचे लोक सांगायलेत, बायांनी कोणते कपडे घालावेत. एकजण म्हणालं ते बायांनी पँट घालु नये. त्यामुळे जरा  मांडयाबिंडया दिसतात आणि मग बलात्कार होतात. अरे काय नालायकपणा आहे. ती जीन्सची पँट स्त्रियांसाठी निर्माण झालेली आहे; पुरुषांसाठी नाही. हा इतिहास माहित आहे का? कोणी कोणते कपडे घालावे,  कोणी काय खावं. गाय खाऊ नये म्हणे. उद्या म्हणतील शेळी खाऊ नये, बकरी खाऊ नये, तितर खाऊ नये, कोंबडं खाऊ नये. अरे, आम्हाला काय खायचे ते आम्हाला ठरवू  द्या. तुम्ही त्याचे कायदे कशाला करता? तुम्ही देशाचं पहा..जे लोक भुकेलेले आहेत या देशातल्या ३० टक्के लोकांना खाण्याचा प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवा आधी…… आणि मग त्याच्यावर बोला. किमतीबद्दल बोलतो मी. तर मी धोतर नेसण्याचा किस्सा सांगत होतो. आम्ही हिंदु म्हणुन फारच पुढे जातोय ना? ते जरा बंद करा. तुम्हाला तुमचा स्वतःचा धर्म पाहिजे की, ...मी या पध्दतीने जगेन. ती रथयात्रा काढली तो अडवाणी नावाचा कोणी माणूस होता. त्यामुळे देशाची जगभर बदनामी झाली. ती मुसलमानांच्या विरोधातली यात्रा होती आणि बाबरी मशीद पाडल्यावर जे काही नुकसान झालं तुमचं आमचं, आणि ती जी प्रतिमा झाली, समाजाचं जे विभाजन झालं, त्याचं नुकसान कोण भरून देणार आहे?

आम्हाला राम मंदिरही नको आहे आणि आम्हाला मस्जीदही नको आहे. आम्हाला काय पाहिजे? आमच्या पोटाचे प्रश्न सुटले पाहिजेत. आम्हाला आधुनिक होता आलं पाहिजे.
काय झालं ते सांगतो धोतराचं तुम्हाला. पेशवाई असताना……… पेशवाई असताना एका सुतारानं ब्राह्मणासारखं धोतर नेसलं म्हणुन त्याचा कुल्ला कापला. तलवारीने कापला. आणि तुम्ही आम्ही म्हणतो तो धर्म आला पाहिजे! त्यासाठी रथयात्रा निघाली पाहिजे! त्यासाठी राममंदिर पाहिजे! त्यासाठी अमुक मंदिर पाहिजे! हे काय चाललं तुमचं आमचं? तुमची आमची किंमत ही आहे. जरा जागे होणार आहात की नाही? आपण आधुनिक होणार आहोत की नाही?
 दुसरा भाग सांगतो तुम्हाला. मी मराठीचा अभ्यासक आहे. मी विश्वकर्माबद्दल बोलणार नाही. खरंच तुम्हाला विश्वकर्मा मान्य आहे का सगळयांना? मग तुमच्या घरात स्वामी समर्थ आला कुठून? तुमच्या घरात गजानन महाराज येतो कुठून? तुमच्या घरामध्ये राम येतो कुठून? रथयात्रा डोक्यात येते कुठून ? एकटया विश्वकर्माचीच पूजा करा. बाकीचे देव बाजूला काढा. ना विठ्ठल , ना रुख्मिणी आणि नाही कोणी. फक्त विश्वकर्मा तुमचा देव असला पाहिजे. आणि तेच तुमचे दैवत तारणारे आहे,  अशी तुमची भावना असली पाहिजे. मग कुळधर्म, कुळाचार करणारा आणि भिऊ नको मी पाठीशी आहे म्हणणारा स्वामी समर्थ, दत्त, अमुक, तमुक हे सगळे - १२५ कोटी देव आहेत ते आपल्या देशात. सगळे बाजूला काढा आणि विश्वकर्मा समोर ठेवा. आम्हाला तेही जमत नाही.ती तयारीच नाही.एक संदर्भ सांगतो मी तुम्हाला अभ्यासक म्हणून. ब्रिटिशांच्या काळात हे बलुतेदार कोण आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. त्यावेळचा तहसिलदार होता नगर जिल्हयाचा त्रिं.ना.आत्रे नावाचा.ते पुस्तक डोक्यावर घेऊन आमचे अभ्यासक नाचत होते . फार महत्वाचं पुस्तक आहे म्हणे गावगाडानावाचं. मी ते पुस्तक मनापासून वाचले. आणि मला डोक्यात तिडीक आली कि, हा माणूस आमच्या बद्दल वाईट लिहितो आहे. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार या ३० जाती होतात. या तीस जाती यांच्या विरोधात त्यांनी लिहिले आहे. आणि आम्ही कोणीही ते बारकाईने वाचलेले नाही. काय म्हटले आहे त्यांनी? ते सांगतो मी आपल्याला . तिथं म्हटलय  की असामीदारांना म्हणजे शेतकऱ्यांना , सतत नाडून, योग्य वेळेला त्याला मदत न करून, बलुतेदार अडवणूक करतात आणि नाडवणूक करतात. हा एक. दुसरा मुद्दा त्यांचा फार भयंकर आहे. येथे जागतिक पातळीवरचे शास्त्रज्ञ  बसलेले आहेत. .लोहार समाजाचे प्राध्यापक लोहार सर. पोतदार सर स्वतः लेखक आहेत. त्यांचे सासरे हे सुद्धा मोठे लेखक होते. वा. रा. सोनार. इथे सुभाष अहिरे आहेत. प्राध्यापक असलेले विजय रायमल सर आहेत. जरा शोध घ्या मी काय म्हणतो त्याचा. उगीच विश्वकर्मा यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि दिंड्या काढा आता बंद करा. समाजाला आधुनिक बनवायचं आहे की नाही ते ठरवा. काय चालले आहे आपले? मी नोकरीला लागलो आहे, मी सुखी आहे; माझा भाऊ उपाशी मेला तेव्हा मला काहीही वाटत नाही. इतके आपण नोकरदार नालायक झालो आहोत.
 हे बोलावे कुठे? आपल्याला जागरूकपणे काम करावे लागेल हे मी सांगत होतो? तर आत्रे काय म्हणाला? गावगाडामध्ये वाचा आणि संदर्भ काढा. लिहा त्याच्यावर .मी लिहिले आहे. मला काही जणांनी सांगितले की तुम्ही त्रि.ना आत्रेंवर काय एवढे तुटून पडला म्हणून? त्यांनी म्हटले आहे, सगळे बलुतेदार म्हणजे नैतिक अधःपतन करणारे लोक आहेत. बलुतेदारांनी गावातल्या दुसऱ्या जातीतल्या किती स्त्रियांना छेडले? किती जणांना बिघडवले आहे? हिम्मत आहे लोहाराची आणि सुताराची, सोनाराची  गावातल्या दुसऱ्या बाईला हात लावायची? तोच जीव मुठीत घेऊन राहतो. गावात दोन-चार बलुतेदारांची घरे असतात. ते कोणाला हात लावू शकत नाहीत आणि इथेच त्रिं.ना आत्रे म्हणतो शेतकऱ्यांना अडवणूक करणारा फसवणूक करणारा हा माणूस आहे बलुतेदार. नैतिक अधःपतन करणारा आहे. संत साहित्याच्या एका अभ्यासकाने लिहिले आहे.हा फार मोठा अभ्यासक आहे संत साहित्याचा- सुंठणकर नावाचा. त्याने लिहिलेय की बलुतेदारांनी नैतिक नेतृत्व केले आहे समाजाचे. लोकांमध्ये नैतिकता वाढवली. म्हणजे त्रिं. ना. आत्रे यांना दिलेले हे उत्तर होतं. पण त्यांनी त्रिं.ना. आत्रे यांचे नाव घेतले नाही भीतीपोटी.
मी जाहीरपणे त्रिं.ना. आत्रे यांचा निषेध केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात लिहिलेले आहे. याला हिम्मत लागते, हे सोपे नाही.  त्या .. बा . रं . सुंठणकर यांनी ' महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य ' या ग्रंथात म्हटले आहे की संतांचे नैतिक नेतृत्व बलुतेदारांनी केलेले आहे. आणि त्याच्यात त्यांनी नावे सांगितली. नरहरी सोनार कोण होता? नावेच दिली त्यांनी. संत आलुतेदार आणि बलुतेदार होते प्रामुख्याने. ठरावीक संत सोडले तर बाकीचे आपलेच आहेत. नरहरी सोनार यांचा किंवा सावता माळी यांचा जयघोष सांगितला नाही आणि आपणही त्याच्यात वाहून जातो. म्हणून आपल्याला डोके नाही स्वतःचे. बलुतेदारांनी विश्व निर्माण केलं. मघाशी उद्घाटक यांनी सांगितले, बलुतेदार आधी कलाकार होता नंतर कारागीर झाला आणि नंतर कामगार झाला. हा प्रवास का झाला? आमचे डोके बंद झाल्याने! बंद का झाले? आम्ही गुलाम आहोत या व्यवस्थेचे.या व्यवस्थेच्या गुलामांना जरी तुम्ही नैतिक अधःपतन केलंम्हटलं तरी चूप बसणार आहोत शेपूट घालून की पेटणार आहोत? तुम्हा आम्हाला गरज आहे जोतीराव फुले यांच्या विचारांची!  पहिल्यांदा आमच्याबद्दल - सुताराच्या बद्दल, लोहारा बद्दल, बलुतेदार बद्दल - पहिल्यांदा आवाज कोणी उठवला असेल तर तो जोतीराव फुलेंनी. आणि  त्यांनी अखंड लिहिले त्याला  अभंगाचं स्वरूप आहे. आणि वैचारिक लिहिलं, ‘शेतकऱ्याचा आसूडमध्ये लिहिलं. ... आणि मरण्यापूर्वी लिहिलेल्या सार्वजनिक सत्य धर्म याच्यात लिहिलं.... सोनाराच्या आणि सुताराच्या पोरांना वेगळे शिक्षण द्या, वेगळ्या शाळा काढा अशी मागणीच जोतीराव फुले यांनी ब्रिटिश सरकारकडे केली; आहे माहित?

आमची पोरे शाळेत जातात आणि अक्षराची ओळख झाली की लगेच कामाला लागतात. नोकरीसाठी शिकायचे नाही; चांगला सज्ञान माणूस होण्यासाठी शिकायचे आहे.
तुमच्या हातात संशोधन आहे. मोठमोठ्या कंपन्या तुमच्या हातात आहेत; ज्या तुम्ही तुमच्या हाताने घातल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर मी मागे मागणी केली की, ते बलुतेदारांचं भले करणार आहात की नाहीत? मध्यंतरी कुंभारांनी फटाके फोडले. कशासाठी? मातीवरचा कर अशोक चव्हाणांनी माफ केला म्हणून. मी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांना सांगितले की तुम्ही एक किरकोळ छटाकभर काम केलं आणि तो कुंभार खूष झाला.  सगळ्या बलुतेदारांचे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात की नाही? त्यांनी मला विचारले की काय प्रश्न आहेत? मी म्हटले ते प्रश्न मी माझ्या पुस्तकात मांडले आहेत जे मी तुम्हाला दिलं आता.तुम्हाला वेळ नाही ना अभ्यासाला आणि सोडवायचे नाहीत. त्याचं कारण असं आहे, की आम्ही निवडणुकीवर परिणाम नाही करू शकत. बारा जाती एकत्र आल्यात तर निवडणुकीवर परिणाम करता येईल. नुसतं सुतार एकत्र आला तर  काहीच करू शकत नाही. एकटे सोनार एकत्र आले तरी परिणाम होत नाही. कोणतीही छोटी जात, अहो एवढीशी जात आहे छटाकभर, काहीच करू शकत नाही. सगळे एकत्र आले तर काहीतरी होईल .
जोतीराव फुले यांनी सांगितले की माकडासारखे वर वर चढत जाऊन आपली घरे बांधणारा जो सुतार आहे, लोहार आहे ,गवंडी आहे यांना कधी सन्मान मिळणार आहे का या दुनियेमध्ये? वास्तुशांतीच्या वेळेला यांचा सत्कार का करीत नाहीत तुम्ही? गृहप्रवेशाच्यावेळी हा प्रश्न जोतीरावांनी विचारला.आणि येथील शेती आधुनिक करायची असेल, तिचे उत्पन्न वाढवायचं असेल तर या बलुतेदारांना तुम्हाला नवे ज्ञान द्यावे लागेल. तुम्हाला अवजारे नवीन मिळतील आणि तुम्हाला पुढे जाता येईल. जोतीराव फुले सांगतात, सरकार ऐकत नाही . नाही ऐकत ते ब्रिटिश होते. जोतीरावांनी सांगून अनेक वर्ष झाली.आता सरकारने तरी करावं. १९६० पासुन २०१९ पर्यंत बलुतेदारांचे प्रश्न एकाही सरकारने गंभीरपणे घेतले नाहीत. मागासवर्गीयांमध्ये टाका आणि आरक्षण द्या ही मागणी फारच फालतू मागणी आहे. मध्येच सुतार किंवा सोनार किंवा कोणीतरी उठतो आणि म्हणतो की आम्हाला एन टीत टाका. एन टी ला किती टक्के जागाआहेत माहिती आहे? दोन ते तीन टक्के जागा आहेत. दहा जागा निघाल्या तर त्यांना किती जागा मिळतील ३%  वाल्यांना? तर शुन्य. हे माहित आहे? शिकलेल्या नाकर्त्यांचा हा धंदा झाला आहे. हे म्हणतात आरक्षण द्या. सरकार म्हणतं दिलं. पण नोकऱ्या कुठे आहेत? जोतीराव फुले म्हणतात, शिक्षण द्यायचं तर ते तंत्रज्ञानाचं  द्या. माझं सरळ म्हणणं आहे की,  मेकॅनिकल इंजिनिअरच्या जागा जर  लोहारांना  ठेवल्या तर किती चांगले लोहार निर्माण होतील. आणि सुताराला दिल्या तर किती चांगले इंजिनीयर देशाला मिळतील. माणसाला एक पावसात भिजल्यावर सर्दी-पडसे होते ना तसे, एक पाऊस झाला की आमचे रस्ते वाहून जातात.त्यालाही सर्दी खोकला होतो.ते पक्के बांधून देणारे लोक निर्माण करायचे असतील तर ......तर कुंभाराला सिव्हिलला पाठवून द्या. ते पक्कं करून देतील ना. आरक्षण सरकारी नोकऱ्यांचं नको आहे आम्हाला.तंत्रज्ञानाचं ज्ञान द्या आणि इंडस्ट्रीमधे जागा द्या.
               अहो तेआपल्याकडे गीरमीट होतं त्याचं ड्रील मशीन झालं ना ? किती प्रगत झालो. औरंगाबादला एकजण लाकडाचा डाय तयार करत होता. विचारलं कोणासाठी चाललंय हे डाय करणं? मला डाय शब्द माहित आहे पण डाय कसा असतो हे माहीत नव्हते.कारण त्या व्यवसायातुन माझ्या बापाने मला बाहेर काढलं. आजोबाचा फारच आग्रह होता, म्हटला तू शीक म्हणुन मी शिकलो.आमचं आयुष्य लाकडात गेलं, लाकडातच जाणार आहे.तुझं तरी जाऊ देऊ नको या लाकडात. मी तर सांगणार आहे माझ्या मुलाला की, बाबा रे, मला लाकडातही जाळू नको. लाकडातच आयुष्य गेलंय माझ्या नातेवाईकांचं. माझा देह एखाद्या दवाखान्याला दे नाहीतर विद्युत-दाहिनीत जाळ. कुठलेही विधी करू नको. मी कुठल्याही धर्माचा नाही. मी मानवता धर्माचा आहे आणि माणुसकीचा धर्म मला कळतो. बाकी कळत नाही कारण जोतीबा फुले यांनी सांगितलं की तुम्ही या पद्धतीने विचार करा. जोतीराव फुले यांनी असं सांगितलं की , देश आधुनिक करण्यासाठी सुतार आणि लोहार यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण द्या. ते अजूनही आम्हाला मिळत नाही असं मला वाटतं. शाहू महाराजांनी पांचाळ होस्टेल सुरू केलं होतं. का बरं? महारांचे होस्टेल मातंगांचे होस्टेल.. वेगळं .कारण ते दोघे एकत्र राहत नव्हते. चांभाराचं वेगळं होस्टेल.मराठ्यांच्या ताटातलं खात नव्हते म्हणून पांचाळांचं वेगळं होस्टेल शाहू महाराजांनी काढलं. आपल्याला मराठ्यांच्या हातचं चालत नाही.यांच्या हातचा चालत नाही ठीक आहे पण बौद्ध मातंगांच्या बद्दल आपण काय विचार करतो ? आंबेडकर ना ? त्यांचे ! आपला काय संबंध? .....आपलं कोण आहे? कोणीच नाही . मग शोधा एक संत ज्ञानेश्वरांना सांभाळलेला आणि मिरवा त्यांचा रथ.
 आरत्या करून जीवन सुखी होणार नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल आणि पुढे जावं लागेल ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.आताही दोघा तिघांनी एकच सांगितलं... नवी संस्कृती निर्माण करावी लागेल. म्हणजे काय करायचं हो ? कोणती संस्कृती? गरोदर असणाऱ्या पत्नीला रानामध्ये नेऊन सोडणाऱ्यांंची  संस्कृती तुम्हाला पाहिजे? का सगळ्या जातींना आपल्या हाताखाली ठेवणाऱ्या आणि  खालचे समजणाऱ्या ब्राह्मणांची संस्कृती तुम्हाला पाहिजे? जानवं घातलेली आणि मुंज करणारी? सोवळे सोडावे लागेल. जयजयकार बंद करावे लागतील. कोणाचाही जयजयकार करू नका .देवांचा ही करू नका आणि कोणा  नेत्यांचाही करू नका. मी कोणीतरी माणूस आहे आणि माझ्यात पुरुषार्थ आहे...
               घरात स्त्रियांना कोंडून ठेवतात आणि बहादूरी करत बाहेर हिंडतात. कधी बाईला आपल्याबरोबरचे समजले आहे का? स्त्री पुरुषांना बरोबरीचे समजणे हा सुद्धा संस्कृतीचा भाग आहे, हे कळाले आहे का तुम्हाला? संस्कृती म्हणजे काय हेच माहीत नाही. आम्ही नुसते संस्कृती संस्कृती ओरडत राहातो. माणसाशी चांगले वर्तन करणे म्हणजे संस्कृती आहे. दुसरं काही नाही. टिळे लावणे आणि देवाच्या आरत्या करणे ,मुसलमानांच्याबद्दल वाईट बोलणे, बौध्दांच्या बद्दल वाईट बोलणं, मातंगांच्या बद्दल वाईट बोलणं म्हणजे संस्कृती नाही.शाहू महाराजांनी होस्टेल काढून तुम्हा-आम्हाला शिकायला याअसं सांगितलं. पांचाळांचं स्वतंत्र हॉस्टेल बांधलं होतं .बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सांगितलं होतं की, तुम्ही बलुतेदारी सोडून द्या. तुम्ही गुलाम झालात.त्यांनी सोडली. त्यांनी सगळ्याच बलुतेदारांना सांगितलं होतं की, बलुतेदारी सोडून द्या .तुम्ही गुलाम आहात. तुम्ही गावातल्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध बोलत नाहीत.घटनेच्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, गावातला एक मोठा माणूस गावाचे शोषण करतो आहे, त्याला किंमत देता कामा नये. म.गांधी म्हणत होते की,गावाला केंद्रस्थानी ठेवून घटना करा. पण बाबासाहेबांनी गांधीजींना विरोध केला आणि म्हणाले की, माणूस केंद्रस्थानी ठेवला पाहिजे,त्याला महत्व दिलं पाहिजे, गावाला  नाही. कारण गाव म्हणजे जातीचे डबके आणि शोषणाचे केंद्र आहे. त्यांनी आपल्याला गुलाम आणि दास बनवून टाकलेले आहे. आपल्याला यातून बाहेर यायचं आहे की नाही? जे शिकले ते बाहेर आले पगारापुरतेच राहिले .इथे लेखक आहेत, बोरुडे आहेत तसेच बरेच जण उपस्थित आहेत, त्यांना माझी विनंती आहे की जरा मराठी साहित्याची पाने उलगडून पहा. कोणी बलुतेदार नायक तुम्हाला मराठी कादंबरीत सापडतो का? कादंबरीचा नायक एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा सोनार आहे का? का नाही? तो काही करत नाही का? काहीच नाही. स्वातंत्र्य आंदोलनाचा भारताचा इतिहास पहा. त्यात किती लोहार, किती सुतार, किती सोनार सापडतात पहा जरा. ते बसले घरात चूपचाप. जे बाहेर पडले ते झाले मोठे. बाकीचे तसेच राहिले. तुम्ही आम्ही बसल्या जागेत कण्हत राहतो आणि कुंथत राहतो.त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. बलुतेदारीतून बाहेर पडलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं, लेखनातून आणि भाषणातून सांगितलं. पण कोणीही बलुतेदारी सोडली नाही .उलट डॉ.बाबासाहेबांना सोडून दिलं. म्हणाले की ,ते आपले नाहीत. आपण कुजक्या स्वरूपात काय म्हणतो? बेक्कार लोक आहोत आपण. मी सगळ्या बलुतेदार आलुतेदारां बद्दल बोलतो आहे. आंबेडकर ना?  त्यांचे आहेत. आपले नाहीत. अहो मंडल आयोगाच्या मागणीसाठी नवबौद्ध बाहेर पडलेत. तेव्हा ओबीसी वाले एनटी वाले काय म्हणत होते? पुन्हा त्यांनाच का रिझर्वेशन?
               कृपा करून जातीयवाद , धर्मवाद करणाऱ्या पक्षांवर विश्वास ठेवू नका. उद्या त्यांना मत देऊ नका.ते घटना पण फेकून देतील. जातीच्या आणि धर्माच्या नावावर आपल्याला गुलाम करतील.त्यांना जाती पाहिजेत आणि धर्म पाहिजेत.तुमच्या आमच्यावर त्यांना राज्य करायचे आहे. तुम्हाला गुलाम करायचे आहे . छोटे छोटे तुकडे  फेकायचे आहेत.हाडूक फेकल्यावर कुत्रा जसे चघळत बसतो तसे तुम्ही आम्ही वेगवेगळे विषय चघळत बसतो. जरा जागे व्हा. बाबासाहेब म्हणाले होते, बलुतेदारीच्या नावाखाली तुमचं शोषण चाललं आहे .जरा लक्षात घ्या आणि बाहेर पडा. . दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बाहेर पडले बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे. आणि १९६० साली महाराष्ट्राने पहिला विधिमंडळाचा कायदा केला की, बौद्धांना आम्ही वतनदारीतून, बलुतेदारीतून मुक्त करत आहोत. बाबासाहेबांच्या मागणीवर यशवंतरावांनी पाऊल उचललं.मात्र बलुतेदारांसाठी काहीही झाले नाही. या सरकारने काही केलं नाही. आणि तुमचं कोणीही ऐकणार नाही. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. कोणतेही सरकार ऐकणार नाही.त्याचं कारण असं आहे की आपण एकत्र नाही.संघटनेची आपली तयारी नाही. आपण कुठलाही टिळा लावतो.पंढरपूरला गेल्यावर तो टिळा लावतो. ज्या ज्ञानेश्वरांनी जातीव्यवस्थेचं समर्थन केलं ते ज्ञानेश्वरही तुम्हा आम्हाला चालतात. हरकत नाही. पण जातीविरोधात उभे राहिलेले जोतीबा फुले चालत नाही. सावित्रीबाई आम्हाला चालत नाही.आम्ही सरस्वतीची पूजा करतो. कुठली सरस्वती ? ती आमची सरस्वती नव्हे. आमच्या संस्कृतीचा भाग नव्हे.आमची संस्कृती सावित्रीबाईने दिली म्हणून आमच्या लेकी शिकल्या. म्हणून त्या आधुनिक झाल्या.तेव्हा सावित्रीच्या प्रतिमेची पुजा करता आली पाहिजे आम्हाला. आम्हाला सरस्वती चालणार नाही.आम्ही करतोय काय ? कुठे जाणार आहोत आम्ही ? आणि आम्ही याच पद्धतीने जाणार आहोत तर आता आमच्या उद्घाटकांनी सांगितल्या प्रमाणं कलावंताचा कारागीर झाला.कारागीराचा कामगार झाला,उद्या तो नुसता मजूर राहील , हमाली करणारा.त्याला कामसुद्धा कुणी देणार नाही.अशी आपल्यासमोर विवंचना आहे.तेव्हा आता जागे व्हा.शतक बदललेलं आहे.एकविसाव्या शतकात आहोत आपण.काय सांगतात हे लोक ? म्हणजे विज्ञानासारख्या विषयात हे - पंतप्रधानांनी बोलू नये कळत नाही. नेहरुंच्याबद्दल तर इतकं वाईट बोलतात हे लोक. नेहरु होते म्हणून आपण इतके आधुनिक झालो.ते म्हणतात ६०वर्षात काय केलं ? रस्ते कोणी केले ? तुम्ही विमानात फिरता ते विमान कोणी केले ?त्यांनीच केले ना? तुमच्या बापाने ! का नाकारता ? भाभा इन्स्टिट्युट कोणी उभी केली? त्यांनीच केली ना ? पुन्हा ते सांगतात की, पुराणामध्ये......आम्हाला फार कौतुक आहे पुराणाचं. जाळुन टाकली पाहिजेत पुराणं एकदाची सगळी. एका गृहस्थाकडं सगळ्या जातीची पुराणं आहेत. परवा एक लेख वाचला मी महार महात्म्यनावाचा.त्यांचं म्हणणं होतं जगाला महार जगाला मार्गदर्शन करीत होता. आणि आपण पुण्य सोडून दिलं म्हणून महार रसातळाला गेला. हे सगळ्याच पुराणात आहे. आणि सगळ्याच जातीच्या बद्दल आहे. आपण बाहेर येऊन विचार केला नाही ना तो या सगळ्यातुन, तोपर्यंत आपण आधुनिक होणार नाही.पंतप्रधान काय म्हणाले सायन्सच्या काँग्रेसमध्ये , ‘आमच्या पुराणामध्ये अगोदरच प्लॅस्टिक सर्जरी होती’ . प्लॅस्टिक सर्जरीने गणपतीची मान बदलली...... त्याला अवयवबदल म्हणतात, चमडी बदलणे वरच्यावर याला प्लॅस्टिक सर्जरी म्हणतात एवढंही  पंतप्रधानांना माहिती नाही.आजचं अलिकडचं विज्ञान, नवं संशोधन सुद्धा ते खोटं ठरवताहेत. अहो एक मंत्री तर म्हणाला , बरं तो आय पी एस होता आणि तो मंत्री आहे आता.डॉर्विनचा सिद्धातंच खोटा आहे म्हणाला.शेपूट गळाली अमुक झालं. माणसाची शेपूट कालांतराने गळाली हा डॉर्विनचा सिद्धात आहे, मान्य करा अमान्य करा. विज्ञानच असं आहे ,ते मान्य करावंच लागतं.सायंटिस्ट लोकांसमोर हे बोलणं बरोबर नाही. अहो हे एवढे बुद्धीमान आहेत ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात ना.बायांवरचे बलात्कार थांबवावेत ना.कशाला धर्माची आणि जातीची भांडणे लावता? आरक्षण म्हणजे जातीची भांडणे आहेत बाकी काही नाही. घटनेची तरतूद बाजुला ठेवुन आरक्षणाचं काम चालू आहे सद्या. इतर मागासवर्गीयांना अजुन पुर्ण आरक्षण दिलंच नाही, त्याचे फायदे दिलेच नाहीत.               त्या व्हीपी सिंग यांनी १९९० ला मंडल आयोग स्वीकारला . १९९२-९३ ला तो लागू झाला परंतु त्याप्रमाणे अजून काहीही झालेले नाही. आपण भ्रमात आहोत की, आमच्यासाठी घटनेत तरतूदआहे . त्याची मागणी करावी लागते. जातीच्या आणि धर्माच्या भांडणांमघ्ये कृपा करून पडु नका. तुम्ही सांगा मी माणूस आहे, माणूस म्हणून जगणार आहे. काय होतंय माहिती आहे का? मुसलमानांचं काय खरं आहे हो? हे तुम्ही-मी म्हणणार. मुसलमान काय म्हणतअसणार, यांचं काय खरं आहे? हे विश्वकर्मीयांना एकत्र करीत चाललेत.सगळे जयजय करीत चाललेत .हे नक्की आपल्या विरोधात बोलणार. मराठे काय बोलत असणार ? सगळे सुतार एकत्र आलेत , सोनार एकत्र आलेत. आपण काय म्हणणार , मराठ्यांनी फार अन्याय केला. मराठे,धनगर, माळी एकत्र बसले की दलितांना शिव्या देणार . अहो सगळेच जर वाईट असतील तर हा देश कसा चांगला असू शकतो? मग नवीन संस्कृती कशी निर्माण होईल ? नवी संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी प्रथम आपली आहे.माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे.भारतातल्या संस्कृतीला आकार देण्याचं काम ना परमेश्वराचं आहे ,ना धर्माचं आहे , ना कुणाचं  आहे . ते काम माणसांचं आहे आणि त्यात ती माणसं आहेत बारा बलुतेदार. हा जो पवित्र कुंभ म्हणतो आपण पूजेला ठेवतात नारळ ठेवण्यासाठी. कुंभाराने तो कुंभ केला नसता तर तो संस्कृतीत आला नसता .दरवाजाची चौकट जर तुम्ही केली नसती तर उंबऱ्यावरील  धान्य ओलांडून आत येणारी लक्ष्मी घरात कशी आली असती?ही सर्व संस्कृती ची कामे त्यांनी केली आहेत. मंगळसूत्र नावाची जी गोष्ट आपण पवित्र मानतो ती सोनाराने केली आहे.त्याच्या कल्पकतेचं त्यातल्या कलावंताचं कामआहे. सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही. खूप गोष्टी आहेत . अहो पेरणीच्या वेळी तिफनला मुठ धरतांना जर तेव्हा तिथं मांग बाई आली तर तिला पसाभर बी द्यावं लागतं की, बरं झालं तू पवित्र वेळेला माझ्या शेतात आलीस.  धान्य खूप उगवू येऊ दे. सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. मी त्या संस्कृतीकडे जात नाही.आता नवीन संस्कृती तुम्हाला निर्माण करायची आहे. ती कोणती? माझ्या पुस्तकामध्ये मी एक प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यातील एक लेख मी एका कॉन्फरन्समध्ये विद्यापीठात वाचला आहे.. सामाजिक न्याय आम्हाला कधी देणार ? भारतीय राज्यघटनेने सामाजिक न्याय देण्याची कल्पना केलेली आहे. सगळ्या समाजाला समान स्थितीत आणू आणि सर्वांना समान संधी देऊ. आर्थिक. राजकीय. शैक्षणिक. सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रात आम्ही सर्वांना समान संधी देऊ. या बारा बलुतेदारांना कधीतरी संधी मिळाली आहे का कुठल्यातरी क्षेत्रात? या लोहार सरांचा बायोडाटा इतका मोठा आहे भारतातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांची पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून वाचली जातात. मला नाही वाटत त्यांना कुणी कुलगुरु करील .कारण नावातच लोहार आहे म्हणून.  मोरे सरांनी सर्व आयुष्य सानेगुरुजी सारखं घालवलं.  पुढे काहीच नाही त्यांना. किती नाव सांगू? माझ्यासमोर खूप मोठी यादी आहे महाराष्ट्रातल्या  बलुतेदारां मधल्या चांगल्या शिक्षकांची आहे, चांगल्या प्राध्यापकांची आहे, प्राचार्यांची आहे. त्यांना संधी मिळत नाही. मग सामाजिक न्याय गेला कुठे? आमच्या समाजाचं काय झालं भारतीय राज्यघटनेने सांगितलेल्या? म्हणून आम्हाला संविधानाचा आदर्श मानावा लागेल.त्याप्रमाणे जावे लागेल. काय म्हणतो ते लक्षात घ्या. आम्हाला संविधान संस्कृती निर्माण करायची आहे ते आमचे उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आधी आम्हाला फुले समजून घ्यावे लागतील. शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, आंबेडकर समजून घ्यावे लागतील. राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगे महाराज यांनी जो प्रचार केला, ती सूत्रे, समजून घेऊन मग घटना समजून घ्या. दोन हजार वर्षे परमेश्वराच्या विरोधात आणि या जाती व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणाऱ्या लोकांचे तत्त्वज्ञान म्हणजे ही राज्यघटना आहे.  बुद्धाचे तत्त्वज्ञान त्यात आहे, वर्धमान महावीर यांचे तत्त्वज्ञान त्यात आहे चार्वाक चे तत्त्वज्ञान त्यात आहे आणि फुले आणि आंबेडकर तर आहेतच. हे सर्व डोळ्यासमोर ठेवून एक नवीन संस्कृती निर्माण करावी लागेल.
               एक साधासा मुद्दा सांगतो तुम्हाला या नव्या संस्कृतीच्या संदर्भात. हे लोक जे आहेत ना सध्याचे संभ्रम समाजात,. . .दहा टक्के आरक्षण देऊन टाकलं सवर्णांना. सवर्णांना दिलं असं ते सांगत आहेत.  मात्र आम्ही अवर्ण आहोत. ते सवर्ण आम्ही अवर्ण. कारण आम्हाला तुमच्या वर्णव्यवस्थेत जागाच नाही.आम्ही कोण आहोत? आधी तर बातम्या यायच्या टीव्ही वर.ते टीव्ही चॅनेल इतके फालतू आहेत ना, कोणीही खरं सांगत नाही. एकतर ते सर्व सरकारने विकत घेतलेले. ५००० कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करणारे हे पहिले सरकार आहे. त्या मनमोहनसिंगना नाव ठेवतात पण त्यांनी न बोलता या देशाची आर्थिक स्थिती सांभाळली. नाहीतर आपण भिकेला लागलो असतो. आपल्याला काही कळतच नाही.  मनमोहनसिंग बोलतच नव्हते मग तीन चार महिन्याला पत्रकार परिषद घेत होतेच. आता साडेचार वर्षे होऊन गेलेत परंतु या पंतप्रधानांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही आणि मॅनेज केलेल्या पत्रकारांना मुलाखती दिल्या.हि गंमतच आहे. परवा एक मुलाखत झाली ती दीड तासाची मुलाखत मॅनेज केलेली होती. प्रश्न यांनी दिलेले होते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्र टाकलं होतं, पत्रकार मोदी आणि मुलाखत देणारे मोदीच. प्रश्न विचारणारे मोदीच आणि उत्तरे देणारे मोदीच. म्हणजे ती बाई मुलाखत घेत नव्हती.प्रश्न यांनी दिलेले होते. त्यांनी दिलेले प्रश्न ती बाई विचारत होती. इतका संभ्रम तुमच्या-आमच्यात पैदा करण्याचं काम चाललेलं आहे, हे १०% दिलं आता समानता येईल, अहो  नोकऱ्याच नाहीत. कुठून आणणार तुम्ही दहा टक्के आरक्षणाच्या नोकऱ्या? कुणाला देणार आहात ? आधीच्या  ५० टक्के आरक्षणाचं काय झालं? आयआयएम नावाची संस्था आहे अहमदाबादला जाऊन बघा ९० एकरावर आहे. तिथला माणूस पदवी घेऊन बाहेर पडला की किमान, किमान.....कमीत कमी १०/२० लाख रुपये पगार घेऊन बाहेर पडतो. तिथल्या ओबीसींच्या आरक्षणाला तिथल्या प्राध्यापकांनी विरोध केला आणि सरकारला सांगितले की आम्ही हे आरक्षण मान्य करीत नाहीत. काय केलं ओबीसींनी? मग सामाजिक न्यायाचं काय झालं? आणि  नव्या संस्कृतीच्या आव्हानाचं काय करायचं? एक मराठीतल्या नामांकित लेखिका त्यांनी असं सांगितलं की आमच्या सोनाराची बाई, सुताराची बाई घराबाहेर पडत नाही. कुंभाराची बाई फार कमी वेळेला कामाला असते, लोहाराची बाई सतत कामाला असते. मग त्यांनी संस्कृतीसाठी . या बायांनी काम केलंय. घर स्वच्छ ठेवायचं स्वयंपाक करायचा. त्या लेखिकेने लिहिलं की पांचाळांच्या घरचं जेवण करून पाहायचं. घर तर स्वच्छ ठेवतेच कारण तिला दुसरे कामच नाही. पांचाळच्या घरच्या स्वयंपाकाची चव सुद्धा वेगळी असते इतरांपेक्षा.फार चांगला स्वयंपाक करतात. मी त्या लेखिकेला फोन केला, ते आता हयात नाहीत  त्या विज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या, की कशाला कौतुक करता? बलुतेदारांनी आपल्या 50 टक्के स्त्रिया घरात बांधून ठेवल्या .त्यामुळे त्यांची प्रगती होणे शक्यच नव्हतं.               त्या जम्मू-काश्मीरमध्ये एका आठ वर्षाच्या मुस्लिम मुलीवर 45 वर्षाच्या पुरुषाने मंदिरामध्ये बलात्कार केला .तेव्हा कुठल्या मंदिरात जाणार आहात तुम्ही? बलात्कार केलेल्या आठ दिवस सतत बलात्कार केला त्या पोरी वर आणि तिला वेदना होऊ नयेत म्हणून तिला गुंगीचं औषध दिलं. शेवटच्या दिवशी त्याने ठरवून टाकले की आता हिला मारून टाकायचे कारण बोभाटा होईल .त्याने समवयस्क नातेवाईकाला फोन केला की आठ दिवस मी त्या मुलीवर बलात्कार करतो आहे आता मी तिला मारून टाकणार आहे. तेव्हा त्याला थांब एवढ्यात नको मारु, कारण मलाही बलात्कार करायचा आहे . दोघांनी बलात्कार केला बेशुद्ध पडलेल्या मुलीवर बलात्कार केला. नंतर तिला मारून टाकलं आणि त्या भाजपवाल्यांनी त्याच्या समर्थनार्थ श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये मोर्चे काढले की आमचा त्यांना पाठिंबा आहे. बलात्काराला पाठिंबा देणारी तुमची माझी संस्कृती आहे की अशा गोष्टीला विरोध करणारे संविधानाला तुमचा पाठिंबा आहे? याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. जोतीराव फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संस्कृती तुम्हा आम्हाला मान्य आहे की या अशा लोकांची संस्कृती तुम्हाला मान्य आहे जी धर्मामध्ये माणसाला बांधून टाकणारी, जातीपातींमध्ये माणसाला बांधून टाकणारी, माणसाचे अस्तित्व नाकारणारी संस्कृती तुम्हाला मान्य आहे हे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे.
               उत्तर प्रदेशात आमदाराने बाईवर बलात्कार केला आणि आमदाराला अटक झाली म्हणून लोकांनी मोर्चा काढला. बिहारमध्ये वसतीगृहात राहणाऱ्या कॉलेजच्या मुलींवर बलात्कार झाला आणि मोठ्या केसेस, मोठी प्रकरणे बाहेर आली. काय चाललं आहे माझ्या देशात? कोणती संस्कृती आहे माझ्या देशाची ?महान संस्कृती म्हणता ना तुम्ही?   माझ्या देशाची परंपरा फार जुनी, कोणती संस्कृती ? तर गरोदर पत्नीला जंगलात पाठवून देणाऱ्यांची संस्कृती, रोज स्त्रियांवर बलात्कार करणारी संस्कृती, लहान  मुलींशी लैंगिक चाळे करणारी संस्कृती की, फुले शाहू आंबेडकरांची समता मानणारी संस्कृती?               तुम्हाला मला सामाजिक न्याय पाहिजे आहे .आमचं शोषण झालेले आहे पिढ्यानपिढ्या पासुन. म्हणुन आमचा आवाज निघत नाही.आणि आमचा आवाज निघत नाही म्हणुन संविधानाने सांगितलेली संस्कृती आम्हाला निर्माण करता येईल त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि ते आपण करावं म्हणुन मी यानिमित्ताने आपल्याला एवढेच सांगू इच्छितो. माझ्या भाषणामध्ये खूप मुद्दे आहेत. खरे तर अजून लिहायचे होते पण आमचे मित्र सुभाष आहिरे पुन्हा पुन्हा फोन करीत होते की भाषण लवकर पाहिजे म्हणून मी थोडसं कमी लिहिलं परंतु वर्तमान नीट समजून घ्या.एवढीच मी विनंती  करणार आहे . वर्तमानात तुमचं अस्तित्व साफ होणार आहे. तुम्हाला कोणी विचारणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासुन किंवा महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासुन , येथे इतर राज्यांचेही लोक आहेत म्हणुन म्हणतो स्वातंत्र्य मिळाल्यापासुन ४७ पासुन ते आता २०१९ येईल. १९ ला तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवुन दिलं पाहिजे की, आम्हाला विचारात घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही आणि जातीयवाद्यांना तर मुळीच मतदान करू नका.               मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर जाऊन बलुतेदारांचे प्रश्न मांडणाऱ्या माझ्याही मनात भीती होती कारण ते सोपं नसतं आणि त्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं आणि त्यानी सांगितले की याच्या संदर्भात काही तरी केलं पाहिजे. साधी गोष्ट आहे, हे खेड्यापाड्यात काम करतात पण इथे शिकलेले आणि नोकरदार लोक आहेत. नागोराव,... खेड्यापाड्यात जे बलुतेदारी करतात, सुतार लोहार कुंभार काम करतात, त्यांच्या संदर्भातला माझा प्रश्न आहे. ते एक तर पूर्णपणे असुरक्षित आहेत, गावात दोन चार घरे असतात , मोठं गाव असेल तर दहा बारा घरं. त्यांना कामही नीट मिळत नाही. या यावर या बलुतेदारांचा अजून  आम्ही कधीही विचार केलेला नाही. त्यांची संख्या मोठी आहे. काहीनी शहरात येऊन  स्वतः मध्ये बदल केला, फर्निचर च्या नादी लागले ते बरे झाले. आले पाहिजे इकडं आणि स्वतः मध्ये बदल केला पाहिजे. काही अजून खेड्यात बसलेले आहेत. .दुष्काळ पडल्यावर शासन मदत करते ती मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे. परंतु शेतात पिकलं नाही तर आम्हाला काही ही मिळत नाही आणि मदतही शासनाकडून मिळत नाही ती आम्हाला मिळाली पाहिजे. यशवंतरावांपासुन ते देवेंद्र फडवणीस, एकाही मुख्यमंत्र्याच्या डोक्यात हे का येत नाही. मी पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्याना या सद्याच्या. त्याचं साधे उत्तरही आलं नाही. सहसा सेक्रेटरी लगेच पत्राचं उत्तर पाठवतात. पण कोणीही पत्राचं उत्तर दिलं नाही, की बलुतेदारांच्या मदतीचा काय? म्हणून तुम्ही-आम्ही एक जात विचार केला पाहिजे की माझ्या समाजातील सामाजिक प्रश्न कोणते आहेत? लेखक म्हणून जे इथे बसलेले आहेत त्यांनी विचार करावा. दीर्घ कादंबऱ्या लिहाव्यात. एक-दोन-तीन लेखकांचा मी मुद्दाम उल्लेख करतो, बाबाराव मुसळेंनी बलुतेदार पद्धतीवर लिहिलेलं आहे. मातंगांवरती, सहाशे पानांची कादंबरी लिहिली, याच्या बलुतेदारीचा काय झालं? जागतिकीकरण झाल्यानंतर बलुतेदारांचा काय झालं यावर श्री शंकर सखाराम नावाच्या कोकणातल्या गृहसथानं कादंबरी लिहिली.त्याच्यात सगळा बलुतेदार केंद्रस्थानी आहे. . अशोक पवार नावाचा मोठा लेखक असून ते  सध्या खूप चर्चेत आहेत . ते  जातीने बेलदार आहेत .. त्यांनी बेलदारांच्या प्रश्नावर लिहिले .. . दलित साहित्यामध्ये जो पूर्वीचा महार आणि आता नवबौद्ध आहे त्याच्यावर खूप लिहिलं गेलं आहे. मातंगा वर लिहिलं गेलं आहे .पण सुतारावर कोणी लिहीत नाही. सोनारा वर कोणी लिहीत नाही. ते नायक होत नाहीत. झालेच तर काहीतरी जोड म्हणुन नावे येतात. सुतार लिहायचं असेल तर रामा सुतार लिहू, रामा लोहार लिहू, या पद्धतीने येतात. आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करा एवढीच विनंती आहे. वर्तमानातले प्रश्न तुम्हाला संपवणार आहेत. माझ्या जवळ जर दहा लाख रु.असतील ना तर त्यात उद्या फक्त चॉकलेट येणार आहेत इतकी महागाई येईल. आपण फार खूष आहोत की हे झालं, ते झालं, पण ते काही खरं नाही. लोक मरणाच्या दारात उभे आहेत. एक रुपया किलो कांदा. मरतीलना सगळेजण. ५० पैसे किलो टमाटा. शेतकरी मरेल . तुम्ही आम्ही सगळेच मरू.तुम्हा आम्हालाही शेती आहे, घराच्या बांधकाम साहित्यावरचा जीएसटी काढा .. घराच्या एकूण बांधकामाच्या ५० % वर जाईल. हे लक्षात ठेवा. जरा जागे व्हा आणि वर्तमानाला सामोरे जाण्यासाठी बलुतेदारांच्या सिस्टीम मधून बाहेर या. आधुनिक गोष्टी स्वीकारा आणि नव्या जगामध्ये या . तंत्रज्ञानाचे शिक्षण मुलांना आणि मुलींना द्या. मुलगी वयात आली की लगेच लग्नाच्या भानगडीत पडू नका. मुलींवर विश्वास ठेवा, त्यांना पुढे जाऊ द्या. त्या जास्त पुढे जाऊ शकतात मुलांपेक्षा हा माझा अनुभव आहे. रोजगाराची संधी नसली तरीही त्यांना विकसित होऊ द्या. येऊन येऊन जाऊन भितो काय आपण? मुलगी आहे, कुठून चारित्र्य बिघडलं तर काय करा. तुम्ही पुरुषांनी काहीही केलं चालतं का ? जरा जागे व्हा आणि नव्या युगाला सामोरे जा.  फक्त  स्वाभिमानाने जगा. जातीच्या कोषामध्ये अडकू नका. माझं जानवं  आहे.माझी मुंज झाली आहे त्यामुळे दुसऱ्या सोनार, सुतारशी जमणार नाही. कारण ते मुंज करीत नाहीत. सुरुवातीला ही चौकट तरी तोडा.
 परवा बीड ला एका मुलाचा खून झाला. दोघांनी प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या भावाने येऊन मुलाला मारलं. महाविद्यालयाच्या रस्त्यावर. दोघे एकत्र शिकत होते. दोघं एकाच जातीचे होते. पोट जात वेगळी होती. पोरगी ची जात उंच होती. आमचं आहेर सुतार, झाडे सुतार आहे.  किती दिवस असं करणार आहोत आम्ही? सोहळे सुतार आणि पांचाळ सुतार असं किती दिवस करणार आहोत आम्ही? ज्या भागामध्ये सुतार आणि सोनार , कुंभार  यांचं लग्न होतं, त्याचा मला खूप आनंद होतो की ते प्रगत आहेत. आणि आपण म्हणतो,  त्यांच्या घरात देऊ नका.वेगळे आहेत , मिक्श्चर   आहे वगैरे....मुलामुलींवर विश्वास ठेवा ते जे काही पाऊल उचलतील त्याचे स्वागत करा.  पाठीशी उभे रहा बिघडू देऊ नका. तुमची मुलं बिघडू देऊ नका. तुमचं जे काय , वाटोळं  व्हायचं ते  झालेलं आहे. आता नव्या पिढीच्या पाठीशी ऊभे रहा. फक्त एक करा. घरामध्ये समग्र जोतीराव फुले आणून द्या. एकदा वाचा आणि डोके बदलून घ्या. म्हणजे वर्तमान कळेल आणि त्याला सामोरे जाता येईल असे आवाहन यानिमित्ताने करतो.
               आमचे मित्र सुभाष अहिरे, खरेतर आता पराग आहिरे यांना मित्र म्हणायला पाहिजे. ते आता माझे मित्र झालेले आहेत. त्या माणसाने एवढ्या उमेदीने हे सगळं केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. पोतदार सर सहित जे जे संयोजनात होते त्या सगळ्यां धुळेकरांना धन्यवाद देतो . की त्यांनी मला संमेलनाचं अध्यक्षपद दिले. सुरुवातीला मलाच प्रश्न होता की आपण यात का बरं पडलो? कारण अर्धं सभागृह रिकामं झालं आहे.आणि आपण काय बोलणार? बाहेर गेलेले  जेवुन येतील,आता आपण जेवायला जाऊ आणि जेवुन आलेले इथं सभागृहात येऊन झोपतील .पण जरा फुले समजून घ्या हि नम्र पणे विनंती करतो.. कारण मी फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणारा माणूस आहे, त्यांच्या विचाराशिवाय आपण आधुनिक होऊ शकणार नाहीत. फुले वाचल्यावर मी माझ्या आजोबांना बदलू शकलो. मी आजोबांना सांगितलं की सोवळे नेसू नका आणि त्यांनी ते मान्य केले. ते नव्वद वर्षांचे असताना त्यांनी मला प्रतिसाद दिला. आपण फुले कडेच वळालो नाहीतर प्रतिसादाचा प्रश्नच नाही.माझी इथे बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे कि काहीच करू नका, फक्त वर्षाला पाचशे रुपयाची पुस्तके आणून मुलांच्या हातात द्या. फक्त ती आधुनिक विचारांची असली पाहिजेत. पुराणं देऊ नका. धर्मशास्त्र देऊ नका .वेद देऊ नका. यांच्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ज्यांना हे करायचे आहे त्यांना माझी विनंती आहे कुठलाही उद्योग धंदा करू नका. फर्निचरचा करु नका,सुतारीचा करु नका. विश्वकर्मा च्या मूर्तीसमोर बसायचं आणि सांगायचं की मला सगळे दे,  रामाला विनंती करायची मला सगळे दे किंवा स्वामी समर्थाला विनंती करायची मला सगळे दे . घराच्या बाहेरच आम्ही जाणार नाही. मरता की वाचता ? पाहतो मी.फुले वाचलात तर आधुनिक दृष्टी येईल. जग बदलेल. तुम्हाला नव्या जगामध्ये प्रवेश करता येईल. ब्राह्मणांच्या पुढचं कौशल्य
, बुद्धिमत्ता तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही जगलं पाहिजे .केलं पाहिजे आणि *नीट संघर्ष करायला शिका. स्वतःची नवीन संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन करतो आणि मी थांबतो.

 डॉ.प्रल्हाद लुलेकर
धुळे. १३ जानेवारी २०१९

शब्दांकन आणि संपादन
प्रभाकर निकुम (9420536225)
प्रल्हाद मिस्त्री
आणि शरद निकुम
नाशिक
प्रोग्रेसिव्ह सुतार ग्रुप



बुधवार, २ जानेवारी, २०१९

सुतार युवाक्रांती : विश्वकर्मीय सामाजिक परिवर्तनाचा झंजावात मराठवाड्या...

सुतार युवाक्रांती : विश्वकर्मीय सामाजिक परिवर्तनाचा झंजावात मराठवाड्या...: विश्वकर्मीय सामाजिक परिवर्तनाचा झंजावात मराठवाड्यातून पेटला ! सुसंवाद परिवर्तन यात्रेच्या शुभारंभास परळी तालुक्यातील समाजबांधवांच्या उ...

विश्वकर्मीय सामाजिक परिवर्तनाचा झंजावात मराठवाड्यातून पेटला ! सुसंवाद परिवर्तन यात्रेच्या शुभारंभास परळी तालुक्यातील समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद.

विश्वकर्मीय सामाजिक परिवर्तनाचा झंजावात मराठवाड्यातून पेटला ! सुसंवाद परिवर्तन यात्रेच्या शुभारंभास परळी तालुक्यातील समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद.
दि.०१ जाने,परळी : श्री विश्वकर्मीय समाज सुसंवाद परिवर्तन यात्रेचा शुभारंभ काल परळी येथील श्री वैद्यनाथाच्या शेजारीच असलेल्या भव्य श्री विश्वकर्मा मंदिरात परळी तालुक्यातील समाजबांधवांच्या वतीने करण्यात आला.स्थानिक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते व युवा मित्रांनी स्वप्रेरणेने या कार्क्रमाचे नियोजन केले होते. समाजाशी थेट समाजरूप होऊन सामाजिक सुसंवाद साधण्यासाठी नांदेडहून युवा क्रांती प्रमुख श्री.बाळासाहेब पांचाळ, श्री.जे.जी. पांचाळ,बाचोटीकर साहेब (वनाधिकारी) प्रा.श्री. नागोरावजी पांचाळ,सिंधीकर सर व बीड जिल्ह्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
परळी तालुक्यातील समाजप्रिय शिक्षक व मार्गदर्शक श्री.अनिल पांचाळ,वडखेलकर सर यांच्या ओघवत्या व खास शैलीतील सूत्रसंचालनाने उपस्थित असलेला प्रत्येक समाज बांधव आपल्या सामाजिक प्रतिक्रिया मनमोकळ्या व्यक्त करीत होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी व तेही सामाजिक विषयावरचे आयोजन वतेही व्यक्तिप्रतिष्ठा,संघटना,हारतुरे व भाषणबाजी या प्रकाराला पुरता गुंडाळून समाजाने समाजासाठी सामाजिक विषयावर आयोजित केलेला हा *शुद्ध सामाजिक* प्रयोग पूर्णतः उद्देष्यपूर्ण सफल झाला.
पुढील काळात परळी येथील संपूर्ण विश्वकर्मीय समाज हा विश्वकर्मीय समाज चळवळीत अग्रेसर राहील व सामाजिक स्वरूपाचेच उपक्रम राबविण्यात येतील. असा निर्धार श्री.अनिल पांचाळ सर,श्री.विष्णुभाऊ साखरे, श्री. सुधाकरजी पांचाळ या स्थानिक नेतृत्वाने केला.
कार्यक्रमाच्या आयोजनात श्री.बाळासाहेब साखरे,श्री.एकनाथ साखरे,श्री अमोल साखरे,श्री.विकास क्षीरसागर,श्री.गोविंद पांचाळ,श्री.पांचाळ सर,श्री मनोहर साखरे,श्री.रामभाऊ पांचाळ व विश्वकर्मा मंदिर समिती व समाजातील सर्व जेष्ठ-तरुण मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.
परळी व तालुक्यातील ग्रामीण भागातील कारागीर बांधवांची समाजातील कष्टकरी व कारागीर बांधवांची १००% कामगार नोंदणी व समाज संपर्क नोंदणी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल त्या करीत सक्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री.भीमाशंकर साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवा मित्र मंडळाकडून प्रयत्न केला जाणार आहे.
संवाद यात्रेचा पुढील ठिकाण सोनपेठ तालुक्यातील येथील समाज बांधवानी याच आठवड्यात आयोजित केले आहे
 सुसंवाद परिवर्तन यात्रेनिमित्त सामाजिक विचारांचा जागर :

"आपला समाज एकत्र येत नाही हा न्यूनगंड बाळगणे म्हणजे मानसिक भानामती आहे. व्यक्तिगत प्रतिष्ठा व पदाची गारुड गुंडाळून ठेवून समाज निरपेक्ष भावनेने समाज जोडता येतो."
"प्रत्येक भागातील सक्रिय असलेल्या तळमळीच्या सच्च्या कार्यकर्तांना सोबत घेऊन समाजाच्या पाठबळावर समाजाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर समाजकारण अधिक प्रभावी करण्याकरिता थेट समाजाशी समाजरूप होण्याकरिता "सुसंवाद परिवर्तन यात्रा" हा झंजावात दिशा मिळेल तिथे फिरवू."

"धार्मिक भावना ठेवून गावोगावी मंदिरे उभी केली, आता राज्यकर्त्यांनी समाजाच्या जीवनकल्याणाचे धोरण राबवावे या करीता संविधानात्मक मार्गाने लढा उभा करूया.संविधानकर्त्याने आपला अधिकार लिहून ठेवला आहे.तो मिळालाच पाहिजे हिच जिद्ध !"

"शिव छत्रपती,महात्मा फुले,लोकराजे शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विभूती म्हणजे सत्य व मानवी जीवनमूल्यांचा जगमान्य साक्षात्कार आहेत. त्यामुळेच विश्वकर्मीय समाजाने मनुवादी पोथ्या-पुराणाच्या व बुद्धीला न पटणाऱ्या भाकड कथांचे पारायण करीत न बसता महापुरुषांचे विचार समजातील सुशिक्षित बांधवांकडून आत्मसात करावे"
श्री.बाळासाहेब पांचाळ

"समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण महतवाचे आहे.त्यामुळे आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खर्चिक रूढी परंपराना दूर ठेवून आर्थिक तरतूद करावी."
"आपल्या समाजात महापुरुषांच्या विचारधारेचे प्रबोधन नसल्यामुळे सत्तरी गाठूनही समाज सामाजिक,राजकीय दृष्ट्या उपेक्षित राहिला आहे"

"समाजातील सुशिक्षित बांधवांचे मार्गदर्शन व मदत मिळावी या करीता जयंत्या मध्ये भजन,भंडारे न ठेवता सामाजिक प्रबोधन,शैक्षणिक प्रोत्सहानपर उपक्रम राबवावेत."
प्रा.श्री. नागोरावजी पांचाळ सिंधीकर सर

"समाजातील कार्यकर्त्यांनी आपल्या समाजात ओबीसी विचारधारा व सामाजिक जागृती करावी."
"आपल्या समाजबांधवांना मदत म्हणून सामूहिक भागीदारीने व्यवसाय करावा.व्यवसायाचे नवीन तंत्र जोपासतानाच पारंपरिक कलेला मागणी यावी या करीता "वस्तू प्रदर्शन व विक्री" मेळावे घेतले पाहिजे."

"आपल्या व्यवसायाची नोंदणी व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करावा. आर्थिक भांडवल मिळविण्याकरिता कागदोपत्री बाजूवर विशेष तयारी करावी.शासकीय सवलतीचा लाभ समाजाला मिळवून द्यावा."
श्री.जयवंतराव पांचाळ साहेब,परिक्षेत्र वनाधिकारी

"सुसंवाद परिवर्तन यात्रेचे नियोजन करण्याकरिता संपूर्ण मराठवाड्यात आम्ही बाळासाहेबांच्या सोबत परळी येथील सर्व कार्यकर्ते सोबत राहू. महाराष्ट्राच्या समाजकारणात मराठवाड्याची विशेष छाप पडणार म्हणजे पडणारच."
श्री.सुधाकर भाऊ पांचाळ  भाजप पदाधिकारी व सक्रिय सामाजिक कार्यकर्ते

"तीर्थक्षेत्र परळी येथील विश्वकर्मा मंदिरात बहुपयोगी निवासी संकुल व सभागृहाचे उर्वरित कार्य पूर्ण करू. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल."
श्री.विष्णुभाऊ साखरे राष्ट्रवादी तालुका पदाधिकारी व मंदिर समिती

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

विश्वकर्मीय समाज परिवर्तन सुसंवादयात्रा,०१ जानेवारी,२०१९ श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर,श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ, बीड

             
         

                        


              ०१ जानेवारी २०१९ : श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर : दुपारी ४ वाजता 

              श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ, बीड

सस्नेह जय श्री प्रभु विश्वकर्मा ! समाजबांधवांनो..आपण सर्वानी समाजसंपर्क नोंदणीस दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबदल हार्दिक आभार !


समाज नोंदणीद्वारे  समाजातील कारागीर,कष्टकरी श्रमिक,जेष्ठ युवासुशिक्षित,कर्मचारीकला-क्रीडा व विविध  क्षेत्रातील सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिक्रियासमाजमत प्राप्त झाले. 


नोंदणी माध्यमातून समाजाने व्यक्त केलेल्या अपेक्षेतूनच समाजाच्या मार्गदर्शनाखाली समाजचळवळीस साक्षेप करण्यासाठी गावोगावी विखुरलेल्या आपल्या माणसांशी सरळ सुसंवाद साधून समाजचळवळीस सक्रिय करण्यासाठी सुसंवाद परिवर्तन यात्रेची संकल्पना प्रत्यक्ष साकारीत आहोत.


तसे पाहता समाज संकल्पनेखाली पिढीजात एकत्र असलेला व परंपरागत नाते संबंधातून समन्वय साधणारा समाज जेंव्हा संघटित होतो तेंव्हाच खऱ्या अर्थाने  सामाजिक,राजकीयसामाजिक व आर्थिक प्रगतीचे ध्येय गाठता येते.

होय, आपण निर्धार केला आहे..नवीन वर्षाचा पहिला दिवस हा विश्वकर्मीय सामाजिक सुसंवाद दिन व्हावा याकरिताच दि.०१ जानेवारी,२०१९ रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग असणाऱ्या मराठवाड्यातील पावन भूमीत श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे आपल्या 

सर्वांच्या सहकार्याने व साक्षीने विश्वकर्मीय समाज परिवर्तन सुसंवादयात्रा प्रारंभ करूया !


पहिल्या टप्प्यात मार्चपर्यंत संपूर्ण मराठवाड्यातील २७ ठिकाणी विश्वकर्मीय समाज परिवर्तन सुसंवादयात्रा माध्यमातून प्रत्यक्ष समाजाशी समाजरूप होण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.


                                   प्रमुख उपस्थित मार्गदर्शक 

                                  
* श्री.विष्णुपंत पांचाळ,अंबेजोगाई                   * श्री वैजनाथरावजी पांचाळ,रायवाडीकर  
    जेष्ठ सामाजिक मार्गदर्शक,बीड जिल्हा                   जेष्ठ सामाजिक मार्गदर्शक,नांदेड जिल्हा
* एड. श्री नवनाथरावजी पांचाळ                     * श्री.नंदकुमार पांचाळ,अंबेजोगाई 
    संचालक कृउबा समिती,धारूर, अभियोक्ता संघ      पत्रकार व वृत्तवाहिनी प्रतिनिधी
* प्रा.डॉ. घ.ना.पांचाळ सर,पालम                    * श्री.जयवंतरावजी पांचाळ,बाचोटीकर  
    विशेष शैक्षणिक मार्गदर्शक                                वनाधिकारी,नांदेड परिक्षेत्र
 * श्री.विष्णू भीमराव पांचाळ,कळंब               * श्री.अशोकरावजी पांचाळ,माजलगाव 
     सामाजिक कार्यकर्ते,उस्मानाबाद                        सामाजिक मार्गदर्शक,बीड जिल्हा
 * श्री.अशोकरावजी गायकवाड,गेवराई           * श्री.दिनेशजी डोरले,केज

     जेष्ठ सामाजिक मार्गदर्शक,बीड जिल्हा                 सक्रिय युवा नेतृत्व बीड जिल्हा

                               सुसंवाद यात्रा संयोजक 

                            श्री विश्वकर्मा श्रमिक क्रांती संघ
* श्री माधवभाऊ पांचाळ,लोहेकर        * श्री नारायणभाऊ पांचाळ,दिग्रसकर 
    विभागीय अध्यक्ष                               विभागीय सचिव
* श्री. भारतजी पांचाळ,लातूर              * श्री.दिगंबरराव पांचाळ,परभणीकर
    विभागीय उपाध्यक्ष                            विभागीय सहसचिव
* श्री. रामभाऊ रत्नपारखी,लातूर         श्री.मंगेशभाऊ पांचाळ,फुलवळकर
   विभागीय उपाध्यक्ष                              विभागीय कोषाध्यक्ष

                                            कार्यक्रमाचे संयोजक 

मंदिर व कारागीर समिती,परळी वैद्यनाथ

समस्त श्री विश्वकर्मीय समाज,परळी वैद्यनाथ

श्री विश्वकर्मा युवा क्रांती मित्र मंडळ,परळी वैद्यनाथ


कार्यक्रमाच्या सत्रात कारागीर बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनेचे संपूर्ण मार्गदर्शन प्रोजेक्टर द्वारे करण्यात येईल.